भक्ती व ज्ञानाचे जिवंत प्रतीक' ज्ञान-कर्म-भक्तियोग' महाप्रवेशद्वारदेहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांचे विचार.
भक्ती व ज्ञानाचे जिवंत प्रतीक' ज्ञान-कर्म-भक्तियोग' महाप्रवेशद्वार
देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांचे विचार.
महा प्रवेशद्वाराच्या उभारणीचा इतिहास उलगडणाऱ्या 'विशेष पुस्तिकेचे प्रकाशन
विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने आयोजन.
देहू, ८ जुलै: देहू येथील 'ज्ञान-कर्म-भक्तियोग' महाप्रवेशद्वार केवळ एक वास्तू नसून भक्ती आणि ज्ञानाचे जिवंत प्रतीक आहे. विश्वधर्म प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी श्रीक्षेत्र आळंदी देहू विकास समितीच्या माध्यमातून उभारलेल्या या महाप्रवेशद्वाराचे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यात मोठे योगदान आहे." असे विचार संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज व देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांनी मांडले.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे औचित्य साधून विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने 'तत्त्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज ज्ञान-कर्म-भक्तियोग महाप्रवेशद्वाराच्या' रौप्य महोत्सवी (२५ व्या) वर्षानिमित्त, समितीच्या कार्याचा आणि महाप्रवेशद्वाराच्या उभारणीचा इतिहास उलगडणाऱ्या 'विशेष पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते देहू येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. हा प्रकाशन सोहळा विश्वशांती दिंडी (आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर) च्या संस्थापक अध्यक्षा ह.भ.प. उषा विश्वनाथ कराड व श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्षा प्रियांका मोरे, श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक आणि माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे, ह.भ.प नितीन महाराज मोरे, देहू देवस्थानचे माजी विश्वस्त बाळासाहेब मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य देहू बाळासाहेब काळोखे, नंदकुमार काळे, विठ्ठलराव काळोखे, पुणे जि.प. माजी सदस्य माऊली काळोखे, माजी सरपंच अशोक मोरे, ह.भ.प डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, प्रा. विकास कंद तसेच देहू नगरपरिषदेचे आजी माजी सदस्य, ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प. बापूसाहेब मोरे म्हणाले, "२५ वर्षापूर्वी जगतगुरु तुकोबारायांच्या नावाला साजेसे असे महा प्रवेशद्वार उभे राहिले. या महाद्वाराच्या निर्मितीने देहूच्या वैभवात मोठी वाढ झाली आहे. आज २५ वर्षांनंतर या संपूर्ण प्रवासाचा इतिहास पुस्तिकेच्या माध्यमातून समाजासमोर येत आहे. ही पुस्तिका भावी पिढीला संत विचारांची आणि तीर्थक्षेत्राच्या विकासाची नक्कीच प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला."
श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी मनोगतात सांगितले की, "श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीने गेल्या अनेक वर्षांत देहू तीर्थक्षेत्राच्या विकासात जे योगदान दिले आहे, त्याचा इतिहास या पुस्तिकेतून जिवंत झाला आहे." असे मत त्यांनी मांडले.
प्रा. स्वाती कराड चाटे म्हणाल्या की, "विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या भव्य महाप्रवेशद्वाराला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या वास्तूच्या उभारणे मागील परिश्रम, इतिहास आणि समितीच्या कार्याला उजाळा देण्याच्या उद्देशानेच आम्ही या पुस्तिकेचे प्रकाशन केले असून, प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे संत सेवा आणि विश्वशांतीचे कार्य भविष्यातही अविरत सुरू ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब काळोखे यांनी केले, सूत्रसंचालन संदीप वसंत शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन उमेश टीजगे यांनी केले.
Comments
Post a Comment