महिलांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहोचली पाहिजेराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील :समर्थ युवा फाउंडेशन यांच्यावतीने आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सहकार्याने आरोग्यवारीचा शुभारंभ
पुणे : वारीची परंपरा ७०० वर्षांहून अधिक जुनी आहे. महाराष्ट्रात असे लाखो वारकरी आहेत ज्यांना वारीला न गेल्यास वर्ष पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, त्या आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या पेलताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा लाजेच्या किंवा संकोचाच्या भावनेने त्या तपासणीपासून दूर राहतात. म्हणूनच अशा आरोग्यसेवा थेट महिलांच्या दारापर्यंत गेल्या पाहिजेत, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
समर्थ युवा फाउंडेशन यांच्यावतीने आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सहकार्याने आरोग्यवारी या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूट येथे हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, एमएनजीएल चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, फ्लीटगार्ड फिल्टर्सचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, वाणिज्य संचालक शंकर करजगी, स्वतंत्र संचालक बागेश्री मंठाळकर यावेळी उपस्थित होते.
राजेश पांडे म्हणाले, आजपर्यंत आरोग्य वारीच्या माध्यमातून १.२१ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, ४ लाखांहून अधिक आरोग्य तपासण्या झाल्या आहेत. वारीच्या माध्यमातून भक्ती आणि आरोग्याचा मेळ साधण्यात येत आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने तरुणाई या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आरोग्य सेवा देत आहे.
शंकर करजगी म्हणाले, या संपूर्ण उपक्रमात मुलींचा सहभाग मोठा आहे आणि अतिशय मनापासून मुली काम करत आहेत, हे अतिशय कौतुकास्पद आहे. वारकऱ्यांची सेवा करण्याने पुण्य मिळेल आणि पुण्यापेक्षा मोठे काही नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वारकरी सेवा आणि गरजूंसाठी वैद्यकीय सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने २ मोबाईल मेडिकल व्हॅन कार्यरत राहणार आहेत. संस्थेने ‘आरोग्यवारी’ उपक्रमाच्या माध्यमातून पुणे ते पंढरपूर वारीदरम्यान ५ हजार वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्याचा संकल्प केला आहे.
पायी चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आरोग्य वारीच्या माध्यमातून होणार आहे. स्तन कर्करोग तपासणी, डोळे तपासणी, तोंडाचा कर्करोग, दातांची तपासणी, रक्तदाब, रक्तातील घटकांची तपासणी, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर तपासणी या आरोग्य तपासणी आरोग्यवारीच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. बागेश्री मंठाळकर यांनी निवेदन केले.
Comments
Post a Comment