प्रा. श्रीराम पुजारी जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता
प्रा. श्रीराम पुजारी जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता
पुणे : बासरीची सुमधुर सुरावट आणि दमदार गायनाने प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता झाली. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे कोथरूड येथील पुण्याई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्राची सुरुवात जयपूर अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी देवकी पंडित यांच्या गायनाने झाली. पं. बबनराव हळदणकर यांच्याकडून मिळालेल्या राग चांदनी मल्हारमधील ‘पपिहा पियू पियू बोले’ ही झपतालातील रचना आणि पं. के. जी. गिंडे रचित आडा चौतालातील ‘उमड घन गगन आयो री’ ही बंदिश रसिकांची दाद मिळवून गेली. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी रचित ‘आली पिया बिन मोरा कैसे जिया तरसत’ ही चैती त्यांनी गायली. रसिकांच्या आग्रहाला मान देत, ‘हे सुरांनो, चंद्र व्हा’, हे नाट्यपद सादर करून त्यांनी गायनाची सांगता केली. त्यांना स्वप्नील भिसे (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी) आणि मीरा निलाखे (तानपुरा व स्वरसाथ) यांनी पूरक साथ केली. उत्सव जोशी यांनी कलाकारांचे सत्कार केले.
याप्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने युवा गायिका मीरा निलाखे (विदुषी देवकी पंडित यांच्या शिष्या) आणि युवा गायक रुद्रनाथ कुलकर्णी (पं. विनोद डिग्रजकर यांचे शिष्य) यांना विदुषी देवकी पंडित यांच्या हस्ते पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अरुण सरनाईक यांच्यावरील ‘पप्पा सांगा कुणाचे’ ही चित्रफीत दाखविण्यात आली. या चित्रफितीच्या माध्यमातून अरुण सरनाईक यांची संपूर्ण कला कारकीर्द रसिकांसमोर उलगडली.
सायंकाळच्या सत्राची सुरुवात सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांनी सादर केलेल्या राग मुलतानीने झाली. त्यांनी आलाप, जोड आणि झपतालातील रचना ऐकविली. त्यानंतर राग मेघमधील मध्यलय तीन तालातील तराणा सादर करून आपल्या मैफलीची सांगता केली. त्यांना पंडित कालिनाथ मिश्रा यांनी तबल्यावर दमदार साथसंगत करत मैफलीत रंग भरले. मृगेंद्र मोहाडकर आणि जयकिशन हिंगू यांनी सहवादन केले. बासरीचे सुमधुर सादरीकरण करताना पंडित रूपक कुलकर्णी यांनी रागातील वैशिष्ट्ये प्रभावीपणे उलगडली.
महोत्सवाची सांगता पंडित ओंकार दादरकर यांच्या गायन मैफलीने झाली. त्यांनी सुरुवातीस राग छायानटमधील विलंबित झुमरा तालातील ‘ए करत हो मोसो नेहा’ ही पारंपरिक बंदिश ऐकवून त्याला जोडून द्रुत तालातील ‘ए रि मालनिया गुंद लावोरी’ ही सुप्रसिद्ध बंदिश ताकदीने सादर केली. त्यानंतर एक तराणा ऐकविला. सुरदासी मल्हार रागातील पंडित गजाननबुवा रचित ‘मोहे डर लागे गरज गरज चमके’ आणि ‘सखी बादरवा बरसन को आए’ या दोन बंदिशी सादर करून रसिकांना स्वरआलापींचा आनंद दिला. राग सोहनी सादर करताना पंडित दादरकर यांनी तीन ताल मध्यलयीत ‘देख देख मन ललचाये’ ही रचना प्रभावीपणे ऐकविली. मैफलीची सांगता संत कान्होपात्रा यांनी रचलेल्या ‘अगा वैकुंठीच्या राया’ या भक्ती रचनेने केली. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे वैशिष्ट्य, सुरेल आवाज आणि दमदार सादरीकरण याचा अनोखा संगम रसिकांना त्यांच्या गायनातून अनुभवायला मिळाला. आशय कुलकर्णी (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), आदिनाथ वैद्य, प्रज्ञा शेडगे (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.
राजेंद्र आवटे, गणेश जाधव यांनी कलाकारांचा सत्कार केला. हेमांगी पुजारी-कामत यांनी कलाकारांचा परिचय आणि सूत्रसंचालन केले. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सचिव ललिता दातार यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment