हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाच्या लढ्याला मोठे यश!*
*हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाच्या लढ्याला मोठे यश!*
*वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाचे आदेश!*
*नाटकाचे नाव बदलून सुधारित संहिता पुन्हा सादर करण्याचे सेन्सर बोर्डाचे निर्मात्यांना स्पष्ट निर्देश*
*मुंबई/रत्नागिरी* : वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या व विठ्ठल भक्तांना हिंसक दाखवणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाने पुकारलेल्या लढ्याला आता मोठे यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा’ने ८ जून २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे. यात वारकरी संप्रदायाचा अवमान टाळण्यासाठी या नाटकातील सर्व आक्षेपार्ह भाग, श्रीविठ्ठल मूर्ती आणि संतांची नावे तातडीने वगळण्याचे आदेश नाट्य निर्मात्याला दिले आहेत.
रत्नागिरी येथे पार पडलेल्या ६४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत वीरशैव समाज (लांजा) निर्मित आणि अमोल रेडीज लिखित-दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर झाले होते. या नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’, ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून खून आणि मुलाची हत्या दाखवत वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवले होते. त्याला समितीने व वारकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. सेन्सॉर बोर्डाचे सचिव सं. पुं. खामकर यांनी नाट्य निर्मात्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नाटकातील पात्रांना दिलेली ‘तुका’, ‘जना’ आणि ‘नामा’ ही संतांची नावे पूर्णपणे बदलण्यात यावीत. नाटकाचे ‘ईठ्ठला’ हे शीर्षक बदलण्यात यावे. नाटकातील प्रमुख कुटुंब हे ‘वारकरी’ न दाखवता निव्वळ एक धार्मिक, साधाभोळा सेवेकरी परिवार दाखवण्यात यावा. तसेच त्यांच्याकडून कोणाचीही हत्या केली जाते असे दाखवू नये, जेणेकरून कोणत्याही विशिष्ट संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. रंगमंचावर प्रत्यक्ष विठ्ठलाची मूर्ती आणि त्या अनुषंगाने येणारे वादग्रस्त प्रसंग पूर्णपणे टाळण्यात यावेत. तसेच ‘‘कुणाला मारु नये असे कुठे लिवलय का विठ्ठलाने?’’ हे अत्यंत संतापजनक वाक्य संहितेतून कायमचे वगळण्यात यावे. तसेन सुधारित नाट्यसंहिता मान्यतेसाठी सादर करण्यासाठी सांगितले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांची भेट घेताच त्यांनी तातडीने दखल घेऊन निर्मात्यांची कानउघडणी केली होती. तसेच सेन्सॉर बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हे योग्य आदेश जारी केले आहेत. त्याबद्दल संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती मंत्री महोदयांचे जाहीर आभार मानत आहे.
या विषय *हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की,* हा केवळ एका नाटकाचा विरोध नाही, तर समस्त वारकरी संप्रदाय आणि हिंदूंच्या जागृत अस्मितेचा हा एक मोठा विजय आहे! अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमची आराध्य दैवते, विठ्ठल माऊली आणि पूजनीय संतांची घोर विटंबना करणारा अघोरी प्रकार या नाटकातून केला जात होता. तो आता सेन्सॉर बोर्डाच्या अधिकृत आदेशामुळे पूर्णपणे थांबला आहे, मात्र आमचा मूळ प्रश्न कायम आहे की, मुळात सेन्सॉर बोर्डाने प्रारंभीच अशा नाटकाला मान्यता दिलीच कशी? यापुढे सेन्सॉर बोर्डाने हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणाऱ्या नाटकांना अनुमती देऊ नये यासाठी कडक खबरदारी घ्यावी आणि नियमावली तयार करावी. हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना यापुढेही असाच चोख जाब विचारला जाईल!
Comments
Post a Comment