सावित्रीबाईंच्या कवितेत समाजक्रांतीचा विचार : प्रा मिलिंद जोशी‘चपराक’तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ कवितासंग्रहाचे लोकार्पण
सावित्रीबाईंच्या कवितेत समाजक्रांतीचा विचार : प्रा मिलिंद जोशी
‘चपराक’तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ कवितासंग्रहाचे लोकार्पण
पुणे : जातीधर्मभेद न मानणारा, समतेचा आणि बंधुतेचा पुरस्कार करणारा सुधारकांचा विचार सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या कवितेतून मांडला. त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी समाजक्रांतीचा विचार आहे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. ही ‘काव्यफुले’ ‘क्रांतीफुले’ आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण ही क्रांतीफुले तुमच्या मनामध्ये विचारांच्या ठिणग्या निर्माण करतील, असेही ते म्हणाले.
चपराक प्रकाशनाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ या कवितासंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. भरत नाट्य मंदिर येथे गुरुवारी (दि. ४) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध लेखक, संशोधक संजय सोनवणी, काकडे शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, कार्यक्रमाचे निमंत्रक घनश्याम पाटील, ज्ञानेश्र्वर तापकीर, चंद्रलेखा बेलसरे, शुभांगी गिरमे मंचावर होते.
सध्या जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवत चालली आहे. दुभंगलेला समाज कधीही उत्कर्षाच्या वाटेने जाऊ शकत नाही. समता आणि बंधुता ही राजघटनेतील मूल्ये कृतीत उतरायला हवीत, अशी अपेक्षा व्यक्त करून प्रा. जोशी म्हणाले, सामाजिक आरोग्याची हानी करणारी जातीव्यवस्था, गुलामगिरी, अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरा यांच्या विषयीची चीड सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. अज्ञान हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अविद्येची काजळी दूर होऊन विद्येचा प्रकाश सर्वदूर पोहोचल्याशिवाय जनसामान्यांचा उद्धार होणार नाही, असा विचार त्यांनी कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. मानव्याची प्रतिष्ठापना हेच सावित्रीबाई यांच्या कवितेचे ब्रीद आहे. जेव्हा समाज जीवनाचा तोल ढळतो, तत्त्वांना ग्लानी येते, नीतीचा विपर्यास होतो आणि माणसांचा पशु होतो तेव्हा समाजाला सावरण्याचे काम कवींनी करायचे असते. हेच काम सावित्रीबाईंनी त्यांच्या कवितेतून केले.
संजय सोनवणी म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक दंभावर हल्ले करणाऱ्या, निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या कविता लोकांपासून दूर राहिल्या याचे उत्तर पुरोगाम्यांच्या विचित्र मानसिकतेत आहे. त्यामुळेच त्यांच्या आद्यतेवरचा अधिकार डावलला गेला. सावित्रीबाई फुले यांचा तत्कालीन स्थितीतील सामाजिक आक्रोश, जगाला ज्ञानवंत बनविण्याची तळमळ ते स्वत:च निर्मिक होण्याच्या प्रक्रियेचा सामाजिक-मानसिक प्रवास या काव्यसंग्रहातून अनुभवता येणार आहे.
प्रास्ताविकात घनश्याम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांनी १७२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘काव्यफुले’ या पुस्तकाचे पुन:प्रकाशन करण्यामागील भूमिका विशद केली. ते म्हणाले, तत्कालीन परिस्थितीवर केलेले भाष्य समाजासमोर यावे आणि सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जनक आहेत हे समाजाला समजावे या हेतूने पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. ॲड. शिवाजीराव काकडे, ज्ञानेश्र्वर तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पुन्हा क्रांतिज्योती’ हा एकपात्री नाट्यप्रयोग डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी सादर केला.
Comments
Post a Comment