भारत-भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन होणार जयपूरलालोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारांचे वितरण
- Get link
- X
- Other Apps
भारत-भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन होणार जयपूरला
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारांचे वितरण
भारत-भारतीच्या उपक्रमात युवा पिढीला जोडण्यासाठी संमेलन घेण्याची घोषणा
भारत-भारतीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी विनय पत्राळे यांची फेरनिवड
पुणे : राष्ट्रीय एकात्मता, संस्कृती आणि संघटन या त्रिसूत्रीचा अवलंब करून वाटचाल करीत असलेल्या भारत-भारतीच्या पुणे येथे आयोजित पाचव्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज (दि. २९) समारोप झाला. सहावे अधिवेशन जयपूर (राजस्थान) येथे घेण्याची घोषणा करण्यात आली असून भारत-भारतीच्या कार्यात युवा वर्गाचा सहभाग वाढावा यासाठी केवळ युवकांचे संमेलन भरविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने डॉ. भास्करदत्ता गोस्वामी (इशान्य भारत), प्रमोद परमार (नेपाळ), छाया निजप्पा (कर्नाटक) यांचा गौरव करण्यात आला.
अधिवेशन जय जिनेन्द्र प्रतिष्ठान (नाजुश्री) गंगाधाम रोड येथे आयोजित करण्यात आले होते. आघाडीचे उद्योजक डॉ. प्रकाश धोका यांची प्रमुख उपस्थिती होती. भारत-भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनय पत्राळे, सचिव रुद्रनारायण तिवारी, महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे महानगराचे आणि पाचव्या अधिवेशनाचे अध्यक्ष अचल जैन मंचावर होते. पाचव्या राष्ट्रीय अधिवेशनात २८ राज्यातील ९१ शहरातून साडेतीनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच दमण-दिव आणि सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातूनही प्रतिनिधी उपस्थित होते.
भारत-भारतीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी विनय पत्राळे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली असून महाराष्ट्र प्रांताच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल तर पुणे महानगराच्या अध्यक्षपदी अचल जैन कायम असणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणाही याप्रसंगी कार्याध्यक्ष पत्राळे यांनी केली. महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरील कार्यभार सोपविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत-भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्याचे प्रस्ताव हैद्राबाद, जयपूर आणि राजकोट येथील प्रतिनिधींनी दिले होते. सहावे अधिवेशन आयोजित करण्याचा मान जयपूरला देण्याचे या वेळी एकमताने निश्चित करण्यात आले. अधिवेशनाचा ध्वज जयपूर येथील प्रतिनिधींकडे या वेळी सोपविण्यात आला.
आज प्रत्येक शहरात विविध प्रांतातील नागरिक एकत्रितपणे नांदत असल्यामुळे छोटा भारत निर्माण झाला आहे. या भारताला एकत्रित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भारत-भारतीच्या माध्यमातून हे कार्य अखंडितपणे सुरू राहणार आहे. या कार्यात युवा पिढीचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी कार्यकारिणीच्या वतीने नवनवे उपक्रम घेण्यात येणार असून युवकांचे संमेलन सुरत येथे घेतले जाणार असल्याची घोषणा राष्ट्रीय सचिव रुद्रनारायण तिवारी यांनी या प्रसंगी केली.
भारत-भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मंडळाची बैठक फेब्रुवारी २०२७ मध्ये तिरुअनंपुरम (केरळ) येथे होणार असून युवकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन बंगळुरू येथे जानेवारी २०२७ मध्ये करण्यात आले आहे. एक भारत श्रेष्ठ भारत आणि २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करणे हे स्वप्न युवकांच्या सहभागाशिवाय पूर्णत्वास येणार नाही हा हेतूने जास्तीत जास्त युवकांमध्ये देशप्रेम व देशभक्तीची भावना निर्माण करत या चळवळीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवकांना जोडण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.
राष्ट्रीय अधिवेशनाच्या यशस्वीतेबद्दल सहभागी प्रतिनिधी व संयोजन समितीचे आभार अचल जैन यांनी मानले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment