पुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा : पंडित सुरेश तळवलकरपुलं यांच्या व्यक्तिमत्वात प्रामाणिकपणा : पंडित सुरेश तळवलकरआशय सांस्कृतिक आयोजित पु. ल. स्मृती महोत्सवाला सुरुवात

पुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा : पंडित सुरेश तळवलकर
पुलं यांच्या व्यक्तिमत्वात प्रामाणिकपणा : पंडित सुरेश तळवलकर

आशय सांस्कृतिक आयोजित पु. ल. स्मृती महोत्सवाला सुरुवात

पुणे : संगीत ही अमूर्त भाषा असल्याने पुलं जे संगीत जगले त्यात एक वेगळाच अर्थ ओतप्रोत भरलेला होता. पु. ल. देशपांडे यांचे संगीत क्षेत्रावरील प्रेम मी अत्यंत जवळून पाहिले आहे. ते स्वत: उत्तम संगीतकार व गुरू होते. दुसऱ्या कलाकाराच्या कलेचा निखळ आनंद घेत त्याचे गुणगान करणे हा पु. ल. देशपांडे यांचा मोठा गुण होता. आजच्या युवा पिढीला पु. ल. देशपांडे यांचे कला क्षेत्रातील महत्त्व आणि योगदान कळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पुलं म्हणजे अतिशय आनंददायी ऊर्जा होते, असे गौरवोद्‌गार तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी काढले.

‘आशय सांस्कृतिक‌’च्या वतीने व ‘पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने अव्याहतपणे आयोजित करण्यात येत असलेल्या यंदाच्या दोन दिवसीय पु. ल. स्मृती महोत्सवाचे उद्‌घाटन बुधवारी (दि. २४) पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पुलंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कोहिनूर कट्टा प्रस्तुत व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आयोजित हा महोत्सव प्रभात रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (NFDC-NFAI) सभागृहात होत आहे.
महोत्सवाचे निमंत्रक, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, स्वागताध्यक्ष, लोकमान्य मल्टिर्पपज को-ऑप. सोसायटी लि.चे सुशील जाधव, संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर, प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी, नाट्यकर्मी किरण यज्ञोपवित, शिल्पकार प्रमोद कांबळे, डॉ. मंदार परांजपे मंचावर होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते पु. ल. स्मृती महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करून महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

पंडित सुरेश तळवलकर पुढे म्हणाले, दुसऱ्या कलाकाराच्या कलेचा निखळ आनंद घेत त्याचे कौतुक करणे ही गोष्ट मी पु. ल. देशपांडे यांच्याकडूनच शिकलो. कलाकाराच्या चेहऱ्यावरूनच तो कलाकार पुढे काय सादर करणार आहे याचा अंदाज पुलंना आधीच यायचा. ही प्रतिभा आणि प्रज्ञा फक्त पुलंजवळच होती. त्यांच्या शेजारी बसण्यानेही एक वेगळीच ऊर्जा मिळत असे. पुलं यांच्या व्यक्तिमत्वात प्रामाणिकपणा होता. तो प्रामाणिकपणा पचविणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, पुलंचे व्यक्तिमत्व विरळे होते. महाराष्ट्रच्या सांस्कृतिक विश्वात पुलंनी काळाच्याही पलिकडे जाऊन कार्य केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन देते. पुलं स्मृती महोत्सवाच्या माध्यमातून पुलंचे संपूर्ण व्यक्तिमत्व, एक कलाकार म्हणून त्यांनी केलेले कार्य युवा वर्गापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. 

समाजातील दिग्गज कलाकारांचा वारसा जोपासण्यासाठी पुलं स्मृती महोत्सवाच्या माध्यमातून कार्य केले जात आहे ते स्पृहणीय आहे, असे सुशील जाधव म्हणाले. 

वर्ष उलटले तरी पुलं अध्यासन कागदावर…
प्रास्ताविकात वीरेंद्र चित्राव म्हणाले, अष्टपैलू हा शब्द तोकडा पडावा एवढे गुण, पैलू पुलंच्या व्यक्तिमत्वात होते. अशा महनीय व्यक्तीची भावमुद्रा संपूर्ण जगावर कोरली जावी या हेतूने या आनंदयात्रेचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम श्रोता घडावा, पुढील पिढीतील कलाकारांवर सांस्कृतिक संस्कार व्हावेत हा हेतू आहे. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या व्यासपीठावरून पुलंच्या नावे विद्यापीठात अध्यासन केंद्र उभारण्याची घोषणा सरकारी पातळीवरून झाली होती. या घोषणेला एक वर्ष उलटून गेले तरी अध्यासनाच्या पूर्ततेसाठी एकही कागद हललेला नाही यांची खंत आहे.

मान्यवरांचे स्वागत सतीश जकातदार यांनी केल. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांचे होते.

बहुरूपी पु. ल. : परिसंवाद
उद्‌घाटन समारंभापूर्वी ‘या सम हा’ या लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात ‘बहुरूपी पु. ल.‌’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात प्रा. मिलिंद़ जोशी (साहित्य), किरण यज्ञोपवीत (नाटक), सुलभा तेरणीकर (संगीत व चित्रपट) यांचा सहभाग होता. प्रमोद कांबळे यांनी यावेळी पुलंचे रेखाचित्र साकारले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंदार परांजपे यांनी केले. सुलभा तेरणीकर म्हणाल्या, पु. ल. देशपांडे यांनी कलेच्या क्षेत्रात गीतकार, पटकथाकार, अभिनेते अशा विविध भूमिका बजावल्या. त्यांच्यावर चार्ली चॅप्लीन तसेच मास्टर विनायक यांचा प्रभाव होता. त्यांना पुण्यातील प्रभात चित्रपटाची संस्कृती आवडत असे. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, पुलंनी मराठी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली देखील. त्यांनी कलेच्या क्षेत्रात नवे विचारप्रवाह समोर आणले. त्यांची कल्पनाशक्ती अव्वल दर्जाची होती तसेच भाषेवरील प्रभुत्व असामान्य होते. ते एक संदर्भश्रीमंत आणि अनुभवसंपन्न परिपक्व लेखक होते. दुसऱ्याचे चांगले बघण्याचा उमदा दृष्टीकोन त्यांच्यात होता. किरण यज्ञोपवित म्हणाले, पु. ल. देशपांडे उत्तम लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, गायक, वादक होते. त्यांनी लेखनाच्या माध्यमातून निर्माण केलेली पात्रे साहित्यकृतीत न ठेवता रंगमंचावर अविष्कृत करत लोकांच्या रोजच्या जगण्यात आणली. त्यांनी उत्तमत्तोम परदेशी कलाकृतींचे रुपांतरण करताना जे चांगले पाहिले, वाचले ते लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने कार्य केले. एक साहित्यिक व नाटककार म्हणून त्यांचे आरेखन उत्तम होते.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश