डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांचा सन्मान लोकशाही समाजवादाचा आवाज बुलंद करणारा : डॉ. श्रीपाल सबनीस
- Get link
- X
- Other Apps
डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांचा सन्मान लोकशाही समाजवादाचा आवाज बुलंद करणारा : डॉ. श्रीपाल सबनीस
मनोहारी मैत्र संघातर्फे डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना भाई वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान
पुणे : राजकारण आणि समाजकारण क्रूर व हिंसक होत आहे. गांधीवादी मंडळींनाही नक्षलवादी ठरवले जात आहे. अशा विपरीत परिस्थितीत कुराणापेक्षा संविधान श्रेष्ठ मानणाऱ्या, विवेकवादी, तत्त्वनिष्ठ आणि कृतीशील कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांचा सन्मान भाई वैद्य यांच्या नावाच्या पुरस्काराने होणे, अन्वर्थक आहे. या निमित्ताने लोकशाही समाजवादाचा आवाद बुलंद व्हावा, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
मनोहारी मैत्र संघ, पुणे यांच्यातर्फे लोकनेते भाई वैद्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कार २०२६, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संविधान प्रत, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एस. एम. जोशी फाऊंडेशनच्या चर्चा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्यसेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य तसेच मनोहारी मैत्र संघाचे प्रमुख मनोहर कोलते, हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, भाई वैद्य यांनी सदैव लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला. डॉ. तांबोळी त्याच विचारांचे पाईक आहेत. ते कृतीशील विचारवंत आहेत. राजकीय पक्षांची कार्यकर्ते, नेते घडविणारी अभ्यास शिबिरे, कार्यशाळा, उपक्रम बंद पडत असताना तांबोळी यांनी मात्र ती सुरू ठेवली आहेत. प्रबोधनाचे, जागरणाचे कार्य ते सातत्याने करत आहेत. बुद्धीनिष्ठ, विवेकी आणि प्रागतिक विचारांतून ते मार्गक्रमण करत आहेत. कोणतेही मतभेद कट्टरतावादाकडे जाऊ नयेत, ही माझी भूमिका आहे आणि त्यासाठी संवाद आणि संघर्ष, या बाजू मी स्वीकारतो. सकारात्मक घटकांविषयी संवाद आणि लोकशाहीवादी वृत्तीतून संघर्ष, असा दृष्टीकोन असला तर समाजवादी अर्थकारण निर्णायक पद्धतीने गती घेईल आणि लोकशाही समाजवादाला बळकटी मिळेल, अशी आशा वाटते.
डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, मुस्लिम समाजाला स्वतःचे भले करायचे असेल, तर त्यांनी प्रबोधनाची, पुरोगामीत्वाची मशाल उंचावली पाहिजे. प्रत्यक्षात मुस्लिम समाज त्यापासून दूर चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे तो मुख्य सामाजिक प्रवाहापासून तोडला जात आहे. संघवादी मंडळींना आणि तुकडे गँगला पुन्हा एकदा मनूवादी आर्यावर्त जन्माला घालायचा आहे. त्यासाठी पद्धतशीरपणे आणि नियोजनपूर्वक ते नरेटिव्ह निर्माण करत आहेत. हे षड्यंत्र वेळीच ओळखून रोखण्याची आवश्यकता आहे. दलित, बहुजनांचे ब्राह्मणीकरण करण्यात संघ यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता मुस्लिम समाजानेही प्रबोधनाचे जागरण घडवण्याचा निश्चय करावा. भाई वैद्य यांच्या कार्याची ती पावती ठरेल.
डॉ. तांबोळी यांनी भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव तसेच हमीद दलवाई यांच्या विचारांशी असलेले नाते उलगडले. आजच्या भयावह, संभ्रमाच्या वातावरणात भाई वैद्य यांचे कार्य आणि विचार दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. लोकशाही आणि संविधानाला असलेले संभाव्य धोके भाईंनी द्रष्टेपणाने ओळखून, त्यांनीच बुद्धीवादी, उदारमतवादी, पुरोगामी परिवाराशी माझा परिचय घडवला. मला सदैव पाठबळ, आधार दिला. त्यांच्या नावाचा पुरस्कार, ही सर्वांत मोठी उपलब्धी आहे, अशी माझी भावना आहे. खरा समाजवाद त्यांनीच जपला, त्यासाठी सातत्याने संघर्ष केला.
मनोहर कोलते यांनी मनोगतात भाई वैद्य यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. प्रा. भागवत थेटे यांनी सूत्रसंचालन केले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment