सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने व सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज*- 'लोकशाही संवाद' कार्यक्रमात विचारवंताचा सूर; महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पाच वैचारिक अभियानांचे उद्घाटन

*सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने व सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज*
- 'लोकशाही संवाद' कार्यक्रमात विचारवंताचा सूर; महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पाच वैचारिक अभियानांचे उद्घाटन

पुणे: हुकुमशाही वृत्तीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकजुटीने तीव्र आणि सातत्यपूर्ण संघर्ष करण्याचा निर्धार आणि जनतेसमोर सतत आपली भूमिका मांडत राहण्याची गरज आहे, अशी भूमिका विचारवंतांनी मांडली. लोकशाहीची पुनर्स्थापना, संविधानाचे पावित्र्य आणि तळागाळातील जनतेपर्यंत नव्याने नाते जोडण्याचा संकल्प युवक काँग्रेसने हाती घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित 'लोकशाही संवाद' कार्यक्रमांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश व रोहित वेमुला यांच्या नावाने वैचारिक अभियानाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी, विधिज्ञ ॲड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे व हमीद दाभोलकर यांनी विचार मांडले. लोकशाही संकल्पवृक्षाला पंचनद्यांचे संकल्पजल अर्पण करून अभियानांची सुरुवात झाली.

घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी शाम्भवी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, सरचिटणीस महेश म्हेत्रे, भूषण रानभरे, अक्षय जैन, प्रदेश सचिव विश्वजीत जाधव, विकास सुपनार, ओंकार मोरे, नेहल देशमुख, श्रद्धा कांगे आदी उपस्थित होते.

मनीष शर्मा म्हणाले, "राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस काळाबरोबर पुढे जात नाही, अशी जनतेची समजूत दिसते. ही समजूत खोडून काढण्यासाठी आपण अधिक एकजुटीने व सातत्याने जनतेसमोर गेले पाहिजे. सध्याचे सत्ताधारी एका आर्थिक प्रारूपाच्या माध्यमातून सत्ता राबवत आहेत. काँग्रेस मात्र गांधीजींनी दिलेल्या सर्वसमावेशक भूमिकेवर काम करत आहे. कामगार, श्रमिक, मजूर, कष्टकरी, महिला, शोषित, वंचित सार्‍या समाजघटकांसाठी काँग्रेस कार्यरत असल्याने मोठा जनाधार होता. हा जनाधार पुन्हा काँग्रेसला मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळात संघर्ष आणि नवनिर्माण, अशा दोन पातळ्यांवर लढावे लागेल. त्यात युवक काँग्रेसचा पुढाकार महत्वाचा आहे."

डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले, "काँग्रेस पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नाही. ते समाजकारणाचे माध्यम आहे. काँग्रेसच्या या परंपरांनी देशाचे भवितव्य घडवले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा नागरिकांचा मूलभूत व नैसर्गिक हक्क असून, त्या हक्काचे संरक्षण करणे, हे सरकारचे काम आहे. पण सत्ताधाऱ्यांचे सत्याशी शत्रुत्व आहे, त्यांना आधुनिक मनुस्मृतीचा अंमल आणायचा आहे. विकृतीकरणात ते पुढे आहेत, त्यामुळे अभियानांच्या माध्यमातून जनजागृती, संघटन, कृती आणि नवे नेतृत्व, अशा क्रमाने प्रवास घडत राहो."

ॲड. असीम सरोदे यांनी सत्ताधाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणा, न्यायव्यवस्थेचे राजकीयीकरण केल्याचा आरोप केला. मानवी हक्कांची पायमल्ली केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवले जात आहे. समाजमाध्यमांची व्यासपीठे सस्पेंड केली जात आहेत. आधुनिक मनुवादाचे हे प्रकार आहेत आणि सर्वत्र नकारात्मकता भरून राहिली आहे. युवकांच्या मनात परकेपणाची भावना निर्माण होत आहे. सर्व पातळ्यांवर विचारशून्यता आणण्याचा हा प्रकार आहे, असे ते म्हणाले.

डॉ. हमीद दाभोळकर म्हणाले, ही अभियाने सातत्यपूर्ण व दीर्घकाळ सुरू राहावीत, ही अपेक्षा आहे. हा प्रारंभ म्हणजे इव्हेंट नव्हे, यामध्ये युवा मनांची लढण्याची वचनबद्धता दिसते आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही धर्मभोळा देश मानवी मूल्यांवर आधारित संविधानावर चालवण्याचे कार्य काँग्रेसच्या पूर्वसुरींनी दीर्घकाळ केले आहे. युवा पिढीच्या कार्यकर्त्यांकडून आता धारणा आणि धोरण, अशा दोन्ही स्तरांवर अपेक्षा आहेत. सत्तेपलीकडचे समाजकारण होणे गरजेचे आहे.

स्मिता पानसरे यांनी बघ्याची भूमिका सोडून बदलांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे, निश्चित भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. कार्यकर्त्यांच्या कृतीमागे वैचारिक अधिष्ठान असले पाहिजे, त्याशिवाय विरोधाला टोकदारपणा येत नाही आणि एकजुटीशिवाय संघर्षाला अर्थ उरत नाही. त्यामुळे एकटे, सुटे सुटे लढण्यात, विरोध करण्यात अर्थ नाही. पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून समान मुद्यांवर एकत्र येऊन, समता, बंधुता, न्यायासाठी लढले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात शिवराज मोरे यांनी नव्या परिवर्तनाची ही सुरवात असल्याचा उल्लेख केला. ही अभियाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन समाजप्रबोधनाचे काम करतील. वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि समतेचा विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सत्यनिष्ठ पत्रकारिता, शिक्षणातील समानता आदी गोष्टींचा जागर यामधून होणार असल्याचे मोरे यांनी नमूद केले. अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.
-

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश