कविता हा अंतरात्म्याचा हुंकार, जाणिवांचा उद्गार – अंजली कुलकर्णीजयश्री श्रोत्रिय लिखित ‘मनाचं आभाळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
कविता हा अंतरात्म्याचा हुंकार, जाणिवांचा उद्गार – अंजली कुलकर्णी
जयश्री श्रोत्रिय लिखित ‘मनाचं आभाळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
पुणे : कविता म्हणजे जीवनाच्या अनुभूतीतून आलेला जाणिवांचा उद्गार, अंतरात्म्याचा हुंकार असते. s कविता म्हणजे कवीने स्वत:चा घेतलेला शोध असतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले.
कवयित्री जयश्री विजय श्रोत्रिय यांच्या ‘मनाचं आभाळ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, विजय श्रोत्रिय, अनिरुद्ध श्रोत्रिय व्यासपीठावर होते. साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने टिळक रोडवरील गणेश हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संवेदना प्रकाशनने कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
अंजली कुलकर्णी पुढे म्हणाल्या, कविता म्हणजे कवीच्या जगण्याचा, अनुभवांचा परीघ असतो. हा परीघ किती खोल असतो त्यानुसार कविता फुलतात. ढोबळपणे स्त्री कवयित्रींच्या बाबतीत तिचे जगणे, अनुभव कवितेत प्रतिबिंबित होते. स्त्री विविध पातळ्यांवर जगत असते, तेच तिच्या कवितेतून आपल्यासमोर येते. निसर्गातील विविध गोष्टी आणि आपल्या आजुबाजूला असलेल्या व्यक्तींचा कवीच्या मनावर परिणाम होतो. त्यातील जाणिवांचा परिणाम किंवा प्रतिबिंब म्हणजे कागदावर उमटणारी कविता असते. अबोध मनात काय दडले आहे हे शोधण्याचा आणि मांडण्याचा ध्यास कवींना असतो.
ज्योस्त्ना चांदगुडे यांनी कवितासंग्रहाचा प्रवास सांगतानाच कवयित्रीचे गुण आणि कविता संग्रहातील बारकावे सांगितले. पुस्तकाची प्रस्तावना आणि काव्य अभिवाचनाची संहिता लिहीताना आपल्याला त्यांच्या कविता जवळून अनुभवता आल्या असेही त्या म्हणाल्या. स्त्री जाणिवेच्या कविता श्रोत्रिय यांच्या संग्रहात अधिक असून कणखर स्त्रीचे घडणारे दर्शन त्यांनी ‘संघर्ष’ ही कविता सादर करत घडवून दिले.
जयश्री श्रोत्रिय म्हणाल्या, कवितेमुळेच वयाच्या ७५व्या वर्षी मी अतिशय आनंदात आहे. साहित्यदीप, कुटुंबीय आणि माझ्या सोबत्यांमुळे मी इथवर पोहोचू शकले.
आईचे शिक्षिका, निवृत्त विंग कमांडरची पत्नी यांपेक्षा कवयित्री हे रूप आपल्याला जास्त भावते असे अनिरुद्ध श्रोत्रिय म्हणाले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निरुपमा महाजन, चिन्मयी चिटणीस, माधव हुंडेकर, धनंजय तडवळकर आणि जयश्री श्रोत्रिय यांनी ‘मनाचं आभाळ’ या नव्या कवितासंग्रहातील कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. धनंजय तडवळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कवयित्री आरती देवगावकर यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.
Comments
Post a Comment