नदी सुधार’मुळे परिसरातील अधिवास नष्ट होतोय : सोमनाथ मुसुडगेरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ‘इंद्रायणी’ स्वच्छता अभियान राबविणारे सोमनाथ मुसुडगे यांचा सन्मान
‘नदी सुधार’मुळे परिसरातील अधिवास नष्ट होतोय : सोमनाथ मुसुडगे
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ‘इंद्रायणी’ स्वच्छता अभियान राबविणारे सोमनाथ मुसुडगे यांचा सन्मान
पुणे : राज्य शासन कोट्यवधी रुपये खर्च करून राज्यात नदी सुधार योजना राबवत आहे. परंतु या योजनेतून सिमेंटची जंगले उभी केली जात आहेत. ज्यामुळे नदीच्या परिसरातील अधिवास नष्ट होत आहे. याची शासनाला जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी सेवा अभियान राबविणारे सोमनाथ आबा मुसुडगे यांनी केले.
सुमारे २० वर्षांपासून इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवणारे देहू गावचे सोमनाथ आबा मुसुडगे यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आज (दि. ३) संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना मुसुगडे बोलत होते. अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर, संचालिका प्रज्ञा महाजन मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सोमनाथ मुसुडगे म्हणाले, स्वच्छ, सुंदर, निर्मळ पाणी मिळविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. परंतु आज सुशिक्षित समाजाच निसर्ग संवर्धन करताना अशिक्षितपणे वागत आहे. त्यामुळे नद्यांचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत आहे. नदी स्वच्छ राहण्यासाठी त्यात सोडले जाणारे सांडपाणी नाले बंद करणे आवश्यक आहे. गावातील नदी प्रदुषित होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे. सन्मानाची अपेक्षा न करता मी सातत्याने इंद्रायणी मातेची सेवा करीत आहे, उगमापाशी नदी जशी स्व्छ असते, तशी संगमापाशी असावी या हेतूने गेली २०-२२ वर्षे अखंडितपणे कार्यरत आहे.
धर्मसंकल्पना काळानुरूप बदलावी : डॉ. सदानंद मोरे…
धर्मसंकल्पना या काळानुरूप बदलल्या गेल्या पाहिजेत अशी आग्रही भूमिका मांडून अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले, नदीचे प्रदुषण, पाण्याचे दुर्भिक्ष्य या घटना मानव निर्मित आहेत. पाण्याचे संकट हे जगातील सर्वात भीषण संकट आहे. नदीत बदल घडले की, तेथील समाज आणि संस्कृती देखील बदलते. ते पुढे म्हणाले, इंद्रायणी नदीचे महात्म्य थोर असून तिला पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक पावित्र्य आहे. संत तुकाराम महाराज यांचे अभंग इंद्रायणी नदीने तारले आहेत. महाराष्ट्र प्राकृत भाषा ही देखील इंद्रायणी नदीकाठी निर्माण झाली असल्याचे दाखलेही त्यांनी दिले. नदीला जसे पौराणिक, सांस्कृतिक महात्म्य असते तसेच शास्त्रीय महत्त्व देखील असते. नद्या प्रदुषित झाल्या तर आपला ग्रह राहण्यास योग्य ठरणार नाही, हे कटू सत्य आहे.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची तसेच पुरस्काराविषयी माहिती विशद केली. मान्यवरांचा सत्कार प्रज्ञा महाजन यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पाणी’ या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात जयंत भिडे, मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, आश्लेषा महाजन, तनुजा चव्हाण, वैजयंती आपटे, स्वाती दाढे, मनिषा सराफ, प्रतिमा कुलकर्णी, मृणाल जैन, आशा केदारे, सुजित कदम यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.
Comments
Post a Comment