सामाजिक कृतज्ञता निधी सामाजिक कार्यासाठी------बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या अविरत समाजकार्याची २६ वर्षे
सामाजिक कृतज्ञता निधी सामाजिक कार्यासाठी
------बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या
अविरत समाजकार्याची २६ वर्षे
- यंदा ९० सामाजिक संस्थांना ३९ लाखांचा निधी समर्पण
पुणे
(प्रतिनिधी)
"शिक्षण नसल्याने नक्षलवाद फोफावला "असे मध्यप्रदेश येथील सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदालय च्या भारती ठाकूर यांनी प्रतिपादन केले.भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर ऑर्गनायझेशन द्वारा आयोजित नवी पेठ येथील निवारा सभागृहात सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून भारती ठाकूर बोलत होत्या."आमच्या शाळांतून व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते आणि आमचा अभ्यासक्रम आम्हीच बनवला असून गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते.पाठांतरावर भर दिला जातो असे प्रतिपादन त्यांनी केले".
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधु सक्सेना ह्यांनी यावेळी आपले विचार मांडले. ते असे म्हणाले," बँक ऑफ महाराष्ट्रने प्रगतीचा खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि बँक येत्या दोन ते तीन वर्षांत अजून प्रगतीची वरची श्रेणी मिळवायचा प्रयत्न करीत आहे."
सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची "बोमरेओ" संघटना करीत असलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन बँक देखील सामाजिक जबाबदारी म्हणूनअसे उपक्रम करायचा विचार करत आहे" असे निधु म्हणाले."गुणवत्ता आणि ग्राहक सेवा यांमध्ये काही तडजोडी न करता उत्कृष्ट सेवा द्यायचा महाराष्ट्र बँकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले".या कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस,नारायण अचलेरकर,मोहन घोळवे, भास्कर माणकेश्वर,डॉ सुनील देशपांडे,ह्यांची मुख्य उपस्थिती होती.प्रारंभी भारती ठाकूर यांचा परिचय सुलभा कुलकर्णी ह्यांनी तर बँकेचे कार्यकारी संचालक व व्यवस्थापकीय संचालक निधु सक्सेना यांचा परिचय डॉ सुनील देशपांडे ह्यांनी करून दिला.
"सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजातील उपेक्षित,दिव्यांग,गतिमंद,कृषी,आरोग्य,क्रीडा,पर्यावरण,गो-सेवा,शैक्षणिक आदि सामाजिक सेवा क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना व व्यक्तींना ह्या संघटनेच्या सदस्यांनी स्वतः निधी गोळा करून आत्तापर्यंत तीन कोटी रुपयांची मदत केली असल्याचे" महासचिव नारायण अचलेरकर ह्यांनी ह्यावेळी सांगितले.पद्मश्री डॉ सुनीता गोडबोले यांच्या बस्तर येथील वनवासी बांधवांसाठी केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल व केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
ह्याप्रसंगी रौप्यमहोत्सवी स्मरणिका साठी विशेष योगदान देणाऱ्या डॉ चंद्रशेखर बारगजे,माधव लेले व मधुसूदन निमकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नव्वद संस्थांना यावेळी रु.३९ लाखांचा निधी समर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस सूर्यकांत सोनसळे ह्यांनी श्रमिक गीत गायिले.
प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर माणकेश्वर यांनी केले.बाळासाहेब फडणवीस यांनी भारती ठाकूर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तर मोहन घोळवे यांनी निधु सक्सेना यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या प्रसंगी मधुकर शिधये यांनी उत्कृष्ट "शंख-नाद" सादर केल्याने कार्यक्रमामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.भारती ठाकूर यांचा परिचय सुलभा कुलकर्णी ह्यांनी करून दिला.सानिका खोपकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास संपूर्ण भारतातून बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त उच्चपदस्थ,कर्मचारी,अधिकारी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment