नृत्यसंस्कार असणारा रसिकवर्ग तयार व्हावा : शर्वरी जमेनीस गानवर्धन आयोजित कथक नृत्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा साजरा

नृत्यसंस्कार असणारा रसिकवर्ग तयार व्हावा : शर्वरी जमेनीस

 

गानवर्धन आयोजित कथक नृत्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा साजरा

 

पुणे : वर्षानुवर्षे गायन तसेच वादनकलेचा आस्वाद घेत असल्याने, या कलांचा आस्वादक रसिकवर्ग मोठ्या संख्येने तयार झाला आहे. तसाच नृत्यसंस्कार असणारा रसिकवर्ग मोठ्या संख्येने तयार व्हावा. रसिकांची दाद, त्यांचा आस्वाद यातून नृत्यकलाकारांचा आत्मविश्वास वाढेल आणि नृत्यकलाही समृद्ध होईल, अशी अपेक्षा प्रसिद्ध कथक नृत्यांगना, अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात गेली ४८ वर्षे कार्यरत असलेली गानवर्धन संस्था आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या कथक नृत्य स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कलकारांना पारितोषिक वितरण आणि त्यांचा नृत्याविष्कार आज (दि. २१) आयोजित करण्यात आला होता. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई, तसेच पराग गाडगीळ यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. पराग गाडगीळ, भाग्यश्री देसाई, शर्वरी जमेनीस यांच्यासह गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, विश्वस्त डॉ. विद्या गोखले व्यासपीठावर उपस्थित होते.

 

शर्वरी जमेनीस यांनी परीक्षकांच्या वतीने गानवर्धन संस्थेच्या नृत्यस्पर्धा आयोजनासाठी कृतज्ञता व्यक्त केली. स्पर्धेचे निकष सांगताना त्या म्हणाल्या, प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटांचा अवधी देऊ न ऑनलाईन व्हिडिओ मागविण्यात आले होते. त्यातून १२ जणांची अंतिम प्रस्तुतीसाठी निवड करण्यात आली. त्यांच्या प्रत्यक्ष सादरीकरणातून परीक्षकांनी अंतिम ३ विद्यार्थी निवडले. राजश्री जावडेकर, शिल्पा दातार यांनी परीक्षणाचे कार्य माझ्यासह केले. कंठसंगीत आणि वाद्यसंगीताच्या तुलनेत नृत्याचा रसिकवर्ग कमी दिसतो. तो वाढावा, यासाठी अभिजात नृत्याचे संस्कार रसिक मनांवर होणे आवश्यक आहे. त्यासाठी नृत्यप्रस्तुतीचे प्रमाणही वाढले पाहिजे. नृत्यकलाकारांना व्यासपीठे मिळायला हवीत, याचा उल्लेख त्यांनी केला.

 

भाग्यश्री देसाई म्हणाल्या, कलाकार हा सुंदरतेच्या वाटेवरचा प्रवासी असतो आणि कला हा उपजीविकेकडून जीविकेकडे नेणारा प्रवास असतो. कलेच्या माध्यमातून कलाकार आनंदासह जगण्याचे प्रयोजन शोधत असतात, हे समजून रसिकांनी आपले आस्वादन समृद्ध केले पाहिजे. देसाई यांनी त्यांची शोध नावाची कविताही सादर केली.

 

पराग गाडगीळ यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ. दयानंद घोटकर यांनी गानवर्धनच्या ४८ वर्षांच्या कार्याची माहिती दिली. गानवर्धचे संस्थापकअध्यक्ष धर्माधिकारी यांच्या मनात अनेक वर्षांपासून नृत्यकलेसाठी गानवर्धनकडून उपक्रम व्हावेत, असे स्वप्न होते. त्याची पूर्तता या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे, याचा आनंद घोटकर यांनी व्यक्त केला. विद्या गोखले यांनी स्पर्धेचा उद्देश, कार्यपद्धती याविषयी विवेचन केले. डॉ. नीलिमा राडकर यांनी सूत्रसंचालन केले.

प्रारंभी शर्वरी जमेनीस यांच्या विद्यार्थिनी आर्या फणसळकर आणि आकांक्षा देशपांडे यांची एकत्रित नृत्यप्रस्तुती झाली. त्यांनी प्रथम कृष्ण वंदना व युगलगीत सादर केले. त्यानंतर तालपक्ष मांडताना ९ मात्रांचा बसंत ताल पेश केला. त्रिपुरासुरवधाचे कथानक नृत्यातून सादर करून त्यांनी दाद मिळवली. उत्तरार्धात पारितोषिकप्राप्त गौरी पेंडसे, वैष्णवी गोपाळे, समृद्धी पुजारी यांची नृत्यप्रस्तुती झाली.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य