पत्रकारिता आणि समाजसेवेतून जीवनदृष्टी विकसित होते*महिला दिनानिमित्त विश्व संवाद केंद्रात आयोजित चर्चासत्रातील सूर


*पत्रकारिता आणि समाजसेवेतून जीवनदृष्टी विकसित होते*
महिला दिनानिमित्त विश्व संवाद केंद्रात आयोजित चर्चासत्रातील सूर

पुणे, दिनांक १४ (प्रतिनिधी)
पत्रकारिता किंवा सामाजिक कार्याकडे केवळ 'पॅशन' म्हणून नाही, तर 'प्रोफेशन' म्हणून पाहावे असे सांगितले जाते.मात्र, आमच्या वैयक्तिक अनुभवातून ही दोन्ही क्षेत्रे व्यवसायाच्या पलिकडे जात तुमची जीवनदृष्टी विकसित करतात,असा सूर विश्व संवाद केंद्र आयोजित 'कर्तृत्त्ववान ती' या कार्यक्रमात उमटला.
विश्व संवाद केंद्र पुणे फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला माध्यमकर्मींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ज्येष्ठ पत्रकार स्वाती राजे, कल्याणी सरदेसाई, ईशान्य भारतात (पूर्वांचल) कार्यरत सेवाव्रती अलका वैद्य आणि वीणा बेडेकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या श्रुती मेहता आणि विश्व संवाद केंद्राच्या संपादक अंजली तागडे यांनी मान्यवरांना बोलते केले.
स्वाती राजे म्हणाल्या, "१९८७ मध्ये मी पत्रकारितेला सुरुवात केली.त्याकाळी पूर्णवेळ वार्तांकन करणारी मी कदाचित पहिली महिला पत्रकार असावी. वार्ताहर म्हणून जरी मला १४ वर्षे 'बायलाईन' मिळाली नसली, तरी प्रत्येक बातमीतून मी समृद्ध होत गेले. माझ्या पुढील प्रवासात संपादकीय दृष्टिकोन महत्त्वपूर्ण ठरला." तसेच, कोणतीही भाषा शाळांमधूनच लोप पावत असते, त्यामुळे शाळांमध्ये भाषेबाबत प्रबोधन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्र म्हणून आपल्या योजनांमध्ये मुलांना प्राधान्य नसल्याची खंत कल्याणी सरदेसाई यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "मुले ही 'व्होट बँक' नसल्याने धोरणकर्त्यांनी त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.आजही मुलांचे प्रश्न आपल्या प्राधान्यक्रमात नाहीत.आश्चर्याची बाब म्हणजे,आपल्या परंपरेत अगदी रामायण-महाभारतातही दत्तक मुलांच्या हक्कांबाबत प्रचंड जागरूकता दिसते."

- पूर्वांचलातील सेवाकार्य
ईशान्य भारतात राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करणाऱ्या वीणा बेडेकर यांनी त्यांचे चित्तथरारक अनुभव सांगितले. आव्हानात्मक वाटले तरी तिथे असणाऱ्या सगळ्या आपल्या बांधवांच्या उन्नयनासाठी काम करावे वाटते.पूर्व सीमा विकास परिषदेच्या माध्यमातून मणिपूर राज्यात विकासाची गंगोत्री आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक गरज लक्षात घेऊन तिथे विविध शाळा सुरु केल्या आहेत.अलका वैद्य म्हणाल्या, "आम्ही कार्याला सुरुवात केली, तेव्हा मणिपूरच्या काही भागात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन 'काळा दिवस' म्हणून पाळला जात असे. शाळांच्या माध्यमातून तिथल्या जनजातींमध्ये आम्ही शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे.तिथे आम्ही राष्ट्रगीत आणि पसायदानही शिकवले.त्यांना आपली नाही,तर आपल्याला पूर्वांचलाची गरज आहे." मणिपूरच्या धगधगत्या वातावरणात शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग घेतानाचे अनुभव त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, पूर्वांचलमधील जगणे माणसाला भारतीय म्हणून समृद्ध करते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेल्या अनेक क्रांतिकारकांच्या कथा आजवर आपण ऐकल्या आहेत. मात्र त्यातल्या काही वीरांगना कधी उघडपणे आपल्यासमोर आल्याच नाहीत. कित्येक क्रांतिकारकांच्या घरातल्या आई,बहिणी, लेकी-सुनांनी केलेला त्याग, त्या-त्या घरातल्या मोठ्या नावांच्या आड झाकोळला गेला. आज त्यातल्या कित्येकांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख जरी इतिहाच्या पानांवर नसला,तरी त्यांच्या बलिदानाची जाणीव आपल्या मनात असावी, ह्या उद्देशाने "भारतकन्या" हे एक प्रार्थनापर गीत दाखवण्यात आले. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर सम्राट कदम यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य