महालक्ष्मी सरस मधून १ कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट!**महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल सुरू करणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.*

*महालक्ष्मी सरस मधून १ कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट!*

*महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल सुरू करणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.*

*मुंबई, दिनांक २ मे २०२६*- प्रत्येक जिल्ह्यातील महिलेला हक्काच व्यासपीठ देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आता नव्या रूपात तयार झालं असून, कोणत्याही जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाची स्पर्धा करण्यासाठी ते सज्ज आहे. या प्रदर्शनात केवळ सजावटीसाठी कंटेनर लावलेले नाहीत तर ते कंटेनर ऑफ इंडिया आहेत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात आत्तापर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार झाल्या आहेत, येणाऱ्या काळात १ कोटी लखपती दीदी तयार करण्याचं उद्दिष्ट आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०२६ सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी उमेद निलेश सागर (IAS), मुख्य परिचालन अधिकारी निखिल ओस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

 विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर, आपल्या देशातील नारीशक्तीच्या शक्तीचा उपयोग देशाच्या विकासाच्या वाटचालीमध्ये करावा लागेल. ज्या क्षणी ही नारीशक्ती मानव संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल त्या क्षणी भारत विकसित होईल. म्हणूनच मोदीजींनी नारीशक्ती सक्षमीकरणाच्या अनेक योजना या ठिकाणी सुरू केल्या. मला आनंद आहे गेला दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये उमेद, मवीमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची चळवळ उभी राहिली. आणि लाखो महिला या चळवळीशी जोडल्या गेल्या. अनेक कुटुंब लाभार्थी झाली. अनेक महिलांनी स्वतःच्या बळावर बचत गटासोबत आपलं कुटुंब ही सक्षम करण्याचं काम केलं. जे मोदीजींना अपेक्षित होतं ते आमच्या महिलांनी करून दाखवलं असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महिलांना मिळणार रोपवाटिकेचे प्रशिक्षण
आतापर्यंत ५० लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत. लवकरच पुढच्या काही वर्षात ही संख्या एक कोटीच्या आकडा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरायला हवे त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. महाराष्ट्रामध्ये ३०० कोटी झाडे लावण्याची एक मोहीम हातामध्ये घेतली. उमेदच्या माध्यमातून एक योजना तयार करून, त्या योजनेमध्ये बचत गटांना नर्सरी तयार करण्याकरता आपण निधी उपलब्ध करून देऊ, नर्सरी तयार करण्याचे काम महिला करतील आणि त्यासोबत दरवर्षी झाड लावणं आणि त्या झाडांची निगा ठेवून याकरताही जे काही आवश्यक त्याचा खर्च आहे तो खर्चही आपण उपलब्ध करून देऊ. त्यामुळे या महिलांना काम आणि उत्पन्न दोन्ही मिळेल त्यासाठी आराखडा तयार करण्याचा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

महिला बचत गटांसाठी उमेदचे मॉल
ग्रामीण भागातील महिलांना हक्काची कायस्वरूपी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी २० जिल्ह्यांमध्ये उमेदचे मॉल उभारण्याचे काम आपण सुरू केले असून उरलेल्या १६ जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच मॉल पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये प्रत्येक तालुक्यात उभारले जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.


“महिलांना 50 हजार कोटींचे कर्ज वितरित, एक रुपयाही न थकवता महिलांनी कर्ज फेडले” - मंत्री जयकुमार गोरे
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर उपस्थित महिलांना संबोधित करताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महालक्ष्मी सरस २०२६ मुळे आमच्या हक्काच्या महिलांना आज रोजगार मिळत आहे. महाराष्ट्रातील इतिहासात पहिल्यांदा इतक्या भव्य स्वरूपात असले महालक्ष्मी सरस प्रदर्शन होत आहे. लाडक्या बहिणींना बळ देण्याचे काम आणि त्यांना स्वतःचा पायावर उभे राहतील या उद्देष्टाने पुढे जात आहोत. देशात ५० टक्के महिला आहेत. आज महिला सगळ्या क्षेत्रात पुढे जात आहेत. उमेदच्या माध्यमातून ६४ लाख कुटुंब यामध्ये सहभागी झाली आहेत. ३४ हजार महिला बचत गट आहेत. ५० हजार कोटी रुपये कर्ज बचत गटाला दिले गेले. आणि हे सर्व कर्ज महिलांनी एक रुपया देखील न थकवता परत केल्याचे म्हणत मंत्री गोरे यांनी महिलांचे कौतुक केले. 

एक कोटी लखपती दीदींसाठी दिवस-रात्र प्रयत्न करणार -
मंत्री गोरे पुढे म्हणाले की, मोदींनी लखपती दीदी संकल्प सुरू केली. त्यानंतर आता ३ कोटी महिलांना लखपती करण्याचा संकल्प घेतला आहे. १ कोटी महिला लखपती झाले पाहिजे ही जबाबदारी आमच्या विभागावर दिली आहे. यासाठी आम्ही दिवस रात्र करू पण आपले स्वप्न पूर्ण करून दाखवू. महालक्ष्मी मिनी सरस होतो तेव्हा १००/१५० स्टॉल होते. मात्र, आता १३ जिल्ह्यात फूड मॉल उभारणार आहोत. आमच्या महिला बाजारपेठा सोबत स्पर्धा घेण्यासाठी तयार आहेत. आम्ही महिलांच्या पाठीशी असेच उभे राहू."असे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे.

Comments